Thursday, September 25, 2008

स्वामी मालिकेतले एक अप्रतिम गाणे

video

Friday, June 13, 2008

वाघांचे फोटो

सुमात्रा (इंडोनेशिया)येथील वाघाचा बछडा.सध्या याला ऒस्ट्रेलियामधील एका प्राणिसंग्रहालयाने दत्तक घेतले आहे.

पांढरे बंगाली वाघ पाण्यात खेळताना.

डोळे हे जुल्मी गडे रोखुनी मज पाहु नका ;)!!!!

सांभाळा बरं का !!! आम्ही बच्चे असलो तरी वाघाचे आहोत म्हटलं !!

दुर्मिळ पांढरा बंगाली वाघ. साया जगात हे फक्त १०० च्या आसपास शिल्लक आहेत.



**@@@# %$) ^& ;) ;) :)



अतिशय दुर्मिळ स्नोव्हाइट वाघ(जर्मनी)



सुमात्रा य्रेथील मायलेक.



पाच वर्षांच्या या बंगाली वाघाने प्रशिक्षकाने पाण्यात टाकलेला मांसाचा तुकडा मिळवण्यासाठी सूर मारला आहे.



वाघाची लांबी ५ फ़ूट ते ९ फूट असते.शिवाय़ दोन तीन फुटांची शेपटी वेगळीच.


ही सर्व छायाचित्रे howstuffworks.com वरुन घेतली आहेत.

Friday, May 30, 2008

चीनमधील भुकंप

चीनमधील सिचुआन परगण्याला १२ मे २००८ रोजी दुपारी २.२८ ला ८ रिश्टर स्केल क्षमतेचा भुकंपाचा तीव्र धक्का बसला.भुकंपाचा केन्द्रबिंदू,चेंगुडु शहरापासुन ९० मैल अंतरावरील वेंचुआन येथे होता.
आज तीस मे रोजी हा ब्लॊग लिहितेवेळी मृतांची संख्या ७०,००० पयंत पोहोचली आहे.इमारती व घरे किती कोसळली याची तर काही गणनाच नाही. ह्या भुकंपातून बाहेर पडलेली उर्जा १९९५ मधे झालेल्या जपानमधील कोबे येथे झालेल्या भुकंपापेक्षा ३० पट जास्त होती.
भुकंपाच्या केंद्राजवळील शहरेच्या शहरे जमीनदोस्त झाली.

उभे पर्वत कोसळले.





लक्षावधी लोकांचे प्रियजन मृत्युमुखी पडले अथवा बेपत्ता झाले.
लक्षावधींची आयुष्याची मिळकत क्षणात मातीमोल झाली.
तरीही कोठेही लूटमार नाही की लोकांची काही तक्रार नाही.
जिकडे तिकडे दिसताहेत फ़क्त एकमेकांना मदत करणारे लोक.काही तासांतच लोक मदतकार्याला लागले.रक्तदानासाठी लोकांच्या रांगा लागल्या.चोवीस तासांच्या आत, सर्व प्रमुख रक्तपेढ्यांची साठवणक्षमता संपली.दुजियानयांग ह्या भुकंपाची सर्वाधिक झळ लागलेल्या शहराकडे जाणाया सर्व महामार्गांवर वाहतुकीची कोंडी झाली.नाही!!! ही वाहतुक शहरातुन बाहेर पळणाया लोकांची नव्हती तर मदतीसाठी शहरात जाऊ इच्छींणाया स्वयंसेवकांची होती.यामधे लोकांच्या मदतीसाठी जाणाया १००० टॅक्सीचालकांचा समावेश होता.चेन गौन्बियाओ या भुकंपग्रस्त भागापासून १५०० मैल अंतरावर असणाया बांधकामव्यावसायिकाची बांधकामाची यंत्रसामग्री अवघ्या अडीच तासात १२० स्वय़ंसेवकांसह चेंगडुकडे रवाना झाली.चोवीस तासातच, सैन्याच्या अभियांत्रीकी तुकडीबरोबरच ते भुकंपग्रस्त भागात पोहोचले.
वैद्यकीय क्षेत्रातील लोकांनी अथक परिश्रम घेतले.कित्येक गर्भवती महीला पार्कीग लॊटमधेच प्रसुत झाल्या.
वेन जियाबाओ हे चीनचे ६६ वर्षीय पंतप्रधान घटनेनंतर अर्ध्या तासाच्या आत घटनास्थळी जाण्यासाठी विमानात बसले.आणि अवघ्या दोन तासात घटनास्थळी पोहोचले.
११,०० पॅरॅशूटधारींनी दोनतीन तासात घटनास्थळी उतराय़ला सुरुवात केली.पाऊस,वादळी वारा आणि ढग यांची पर्वा न करता त्यांनी दुर्गम पर्वतराजित उड्या मारल्या.
पहिली उडी मारली ती एक्कावन वर्षीय सिनियर कॊलोनेल ली झेनाबो यांनी.

खचलेली जमीन व खराब हवामान यामुळे जेव्हा हवाई मदत करणे अवघड झाले तेव्हा ५७ वर्षीय मेजर जनरल सिया गुओफ़ु यांच्या नेतृत्वाखाली ६०० जवान व वैद्यकीय मदतनीसांची टीम चालत निघाली.सिचुआन लष्करी विभागाचे मुख्य कमांडर जड ओझे घेऊन २१ तासांची पायपीट करुन पोहोचले.भुकंपाच्या केंद्रबिंदुपाशी पोहोचणारी ही पहिली तुकडी होती.



खचलेल्या रस्त्यांमुळे अवजड यन्त्रसामुग्री नेणे अवघड झाले.जवानांना हातानेच ढिगारे उपसून टनावारी कॊक्रीट हलवावे लागले.
लोक हिरिरीने द्रव्यदान करत आहेत.
भुकंपात घर गमावलेल्या सु चाओ याने ५ युआन देणगी दिली.तो म्हणतो,त्याच्यापेक्षा वाईट परीस्थिती असलेले आणखी कितीतरी लोक आहेत.
तीन वर्षीय सॊंग झिनीयींग हिला दोन दिवसांनंतर ढिगायाखालुन बाहेर काढण्यात आले.तीने एक पाय गमावला असला तरी तिच्या जिवाला काही धोका नाही.दुर्दैवाने तिचे पालक मात्र वाचू शकले नाहीत.
अकरा वर्षांचा झांग जिवांग हा आपल्या तीन वर्षांच्या झांग हान या बहिणीला घेऊन भुकंपाच्या केन्द्रबिंदुजवळुन बारा तास चालत आला.
ह्या चार पाच महिन्यांच्या बाळाला चोवीस तासांनी बाहेर काढण्यात आले.त्याच्या अंगावर साधा ओरखडाही नव्हता हा चमत्कारच.

Wednesday, May 28, 2008

घाशीराम कोतवाल : कथानक

घाशीराम कोतवाल या विजय तेंडुलकरलिखीत नाटकाचे कथानक खाली थोडक्यात दिले आहे.

घाशीराम हा कनोजी ब्राह्मण.तो गुलाबी नावाच्या एका बाईच्या तमाशाच्या फडात काम करत असतो.एकदा नाना फडणवीस हे ह्या गुलाबीला भेटायला आले असताना ते घाशीरामच्या अदबशीर वागणुकीवर खुष होऊन त्याला गळ्यातला मोत्याचा हार बक्षीस देतात. नाना निघुन गेल्यानंतर गुलाबी घाशीरामकडे त्या हाराची मागणी करते. घाशीराम नकार देतो.गुलाबी तो हार जबरद्स्तीने हस्तगत करते व घाशीरामला हाकलवुन लावते.घाशीराम ब्राह्मण असल्याने दुसया दिवशी पेशव्यांच्या रमण्यात भोजन व दक्षिणेसाठी जातो.तेथे पुण्याचे ब्राह्मण त्याच्यावर चोरीचा आळ घेतात. त्याला हद्दपार केले जाते.
अपमानीत घाशीराम सुडाची प्रतिज्ञा करतो.गावी जाऊन आपली रुपसुंदर मुलगी ललितागौरी हिला घेऊन परत पुण्यात येतो.
नानांकडे गणपती बसलेले असताना गौरी त्यांच्या वाड्यावर दर्शनासाठी जाते. विवाहीत व वयाने प्रौढ असलेले नाना तिच्यावर लुब्ध होतात.त्यांना गौरीशिवाय काही सुचेनासे होते.
घाशीराम गौरीच्या बदल्यात नानांकडे पुण्याचे कोतवालपद मागतो.मनातल्या मनात काही गणिते करुन नाना घाशीरामला पुण्याचा कोतवाल करतात.घाशीरामाचा पुण्यावरील अंमल सुरु होतो.तो पुणेकरांवर अनेक जाचक नियम लादतो.प्रेत जाळण्यापासुन सर्व गोष्टींसाठी परवानापध्दत लागू करतो.रात्री अपरात्री घरांच्या झडत्या घेतल्या जातात.पुणेकर जनता नुसती संत्रस्त होऊन जाते.
नाना ललितागौरीमधे मश्गुल असतात.कोतवालाविरुध्दच्या तक्रारींची ते अजिबात दखल घेत नाहीत.
पुढे ललितागौरीचा एका सुईणीच्या हातुन संशयास्पद मृत्यू होतो.घाशीरामला प्रथम खुप शोक होतो पण हळुहळु तो सावरतो.मुलीच्या म्रृत्युनंतर घाशीराम फारच पिसाटतो.त्याला मनुष्यवधाची चटक लागते.
काही दाक्षिणात्य ब्राह्मण पुण्यात आले असतात.ते कोतवालाच्या घराजवळच्या घराजवळच्या धर्मशाळेत उतरले असतात. ह्या ब्राह्मणांना कोतवालाच्या बागेतली फुले तोडल्याच्या आरोपावरुन कोठडीत डांबले जाते.यातील काही ब्राह्मणांचा कोठडीत गुदमरुन म्रुत्यू होतो.ह्या घटनेनंतर पुण्याचा ब्रह्मवृंद क्रुध्द होतो.जमावाने नानांच्या वाड्यावर जातो व कोतवालाच्या वधाचे फ़र्मान काढण्याची मागणी करतो.नाना आनंदाने फ़र्मान काढतात.कोतवालाची विटंबना करुन त्याला ठार मारण्याचे आदेश देतात.
कोतवालाची धिंड काढून त्याला दगडाने ठेचून ठार मारले जाते.त्याच्या म्रृतदेहावर अंत्यसंस्कारही केले जात नाहीत.नाना पुण्यात तीन दिवस उत्सव साजरा केला जावा असे सांगतात आणि नाटक संपते.

Sunday, May 25, 2008

वायकॊपी

तुम्ही मित्राकडून तुमच्या आवडत्या एम्पीथ्री फ़ाइल्सने खचाखच भरलेली एखादी सीडी आणता.
किंवा कामाच्या ठिकाणी तुमचा बॊस किंवा सहकारी तुम्हाला उपयुक्त प्रोग्राम्सने भरलेली एखादी सीडी देतो
किंवा तुमच्याकडे एखादी करप्ट झालेली हार्ड डिस्क आहे.
आणि या सीडी किंवा हार्ड डिस्क वरच्या फ़ाइल्स तुम्हाला तुमच्या system वर कॊपी करावयाच्या आहेत.
तुम्ही कॊपी करायला सुरुवात करता.पहील्या काही फ़ाइल्स व्यवस्थित कॊपी कॊपी होतात.
आणि मग.........
काहीतरी अनाकलनीय मेसेज स्क्रीन वर येउन कॊपी होणे थांबते.बरं तर बरं,किती फ़ाइल्स कॊपी झाल्या,किती व्हावयाच्या
आहेत याचाही काही पत्ता लागत नाही आणि मग डोके आपटुन घेण्यापलीकडे तुमच्याकडे काही पर्याय रहात नाही.
तुमच्यावर वारंवार अशी वेळ येत असल्यास... "वायकॊपी" हा प्रोग्राम खास तुमच्यासाठी बनवला गेला आहे.
हा एक छोटासा प्रोग्राम आहे.ह्या प्रोग्रामद्वारा फ़ाइल्स कॊपी करताना ज्या फ़ाइल्स काही कारणाने कॊपी होऊ शकत नाहीत त्यांची नावे एका लॊग मधे घालुन प्रोग्राम तेथेच न थांबता पुढे जातो आणि शेवटी तुम्हाला कॊपी न होऊ शकलेल्या फ़ाइल्सच्या नावांचा एक लॊग मिळतो जो तुम्ही प्रिंट करु शकता वा सेव्ह करु शकता.
http://www.ruahine.com/ येथुन तुम्हाला हा उपयुक्त प्रोग्राम डाउनलोड करता येइल.तुमची इच्छा आणि ऐपत असल्यास तुम्ही हा प्रोग्राम बनविणायाला काही रक्कम तुम्ही डोनेट्सुध्दा करु शकता.मात्र ते ऐच्छीक असुन हा प्रोग्राम वापरण्यासाठी तुम्हाला काहीही शुल्क द्यावे लागत नाही.

Saturday, May 24, 2008

दे धक्का





आजच "दे धक्का" हा मराठी चित्रपट पाहीला. तुम्हाला हा चित्रपट बघायचा असला तरीही तुम्ही पुढे वाचु शकता कारण येथे चित्रपटाचे संपुर्ण कथानक दिलेले नाही, तर फक्त ओळख करुन दिलेली आहे.
चित्रपटातील घटना घडतात त्या कोल्हापुरजवळील एका छोट्याशा गावात,कोल्हापुर-मुंबई रस्त्यावर व मुम्बईमधे.चित्रपटाच्या सुरवातीला या गावातल्या एका कुटुंबातील माणसांशी प्रेक्षकांचा परिचय करुन दिला आहे.मोटर दुरुस्तीचे काम करणारा मकरंद(मकरंद अनासपुरे),त्याची दुसया लग्नाची बायको,पैलवान होण्याचे स्वप्न बघणारा मुलगा,नृत्याची आवड असणारी मुलगी व मकरंदचा दारुड्या बाप असे हे कुटुंब.या कुटुंबाबरोबरच मकरंदचा चोरी करण्याचा मानसिक आजार जडलेला मकरंदचा मेव्हणा(सिध्दार्थ जाधव) व इतर काही पात्रेही दाखवली आहेत. कुटुंब फारच गरीब.मकरंदने मोटरचे पेट्रोल वाचवणारा पार्ट शोधुन काढण्याच्या नादात बरेच पैसे उधळलेले. मकरंदच्या मुलीला मुंबईला होणाया नृत्याच्या स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळते. ह्या स्पर्धेचे बक्षीस असते रुपये एक लाख फक्त. असतील नसतील ते सर्व पैसे जमा करुन, नाना खटपटी करुन हे कुटुंब मुंबईला जायला निघते. वाटेत अनंत अडचणी येतात.आपसात भांडणे होतात आणि त्यातुनच ह्या कुटुंबातल्या लोकांचे परस्पर संबध अधिकाधिक घट्ट होत जातात. अशा अडचणींतुन मार्ग काढत, आपला कोल्हापुरी गावरान बाणा जपत,त्या गावरानपणाचा कुठलाही न्युनगंड न बाळगता हे कुटुंब मुंबईत येउन पोचते.पुढे काय होते ते पडद्यावरच बघणे इष्ट ठरावे.
हा सिनेमा आम्ही गोरेगाव येथील मुव्ही स्टार ह्या थेटरात पाहीला. हे थेटर गोरेगाव व जोगेश्वरीच्या साधारणपणे मध्यावर आहे.
येथे आत सोडण्यापुर्वी तुमच्या सामानाची झडती घेतली जाते व काही खाद्यपदार्थ सापडल्यास ते काउंटरवर जमा करावे लागतात आणि आतमधे खाद्यपदार्थ साधारणपणे पाच ते दहा पट महाग आहेत.तेव्हा चित्रपट बघण्याअगोदर बाहेरच पोट्पूजा करावी हे उत्तम.
ह्या चित्रपटात सारासारविचाराला "धकका" देणाया काही गोष्टी आहेत, पण त्या हिंदी चित्रपटांएवढ्या घाउक प्रमाणात नाहीत. एकंदरीत काय तर जमल्यास एकदा बघावा असा हा चित्रपट आहे.
ह्या चित्रपटाचा काही भाग तुम्ही खाली दिलेल्या लिंक्सद्वारे बघु शकता.
व्हिडीओ-१
व्हिडीओ-२

Wednesday, May 21, 2008

आमचा कोकणदौरा

"अविनाश, जरा कपाटावरची सूटकेस काढून तिची चेन रीपेअर करून आण बरं!" कुटुंबाचे फ़र्मान सुटले आणि मी ओळखले की यंदा कोकणात जायचे नक्की झाले. कुटुंबाच्या मनात काय आहे ते असे आडवळणानेच ओळखावे लागते.


तसे लग्न झाल्यावर दोन तीनदा आम्ही कोकणात गेलो होतो. पण ते फ़क्त दापोलीला जाउन तिथे तीन चार दिवस राहून परत. (दापोली हे कुटुंबाचे गाव.) ह्या वर्षी मात्र तसे न करता कोकणात जमेल तितकी भटकंती करायची असे मनात होते. एक मे ला म्हणजे गुरवारी मला सुट्टी होती. तेव्हा शुक्रवारी एक दिवस रजा टाकली तर गुरवार शुक्रवार शनवार व रवीवार असे सलग चार दिवस मिळत होते. एप्रिलच्या पहील्या आठवड्यापासुनच रजेसाठी मोर्चेबांधणी करायला सुरुवात केल्यावर असे समजले की शुक्रवारी दोन मे ला नेमकी एक डिलीव्हरी आहे.
(प्रोजेक्टची डिलीव्हरी. गैरसमज नसावा.) तेव्हा रजेवर जाण्याच्या अगोदर सर्व काम पुर्ण झाले तरच रजा मिळणार होती. शेवटी अर्थस्य पुरुषो दासः हेच खरे.


रजा मिळणे अनिश्चित झाल्यामुळे फारच पंचाईत झाली. रेल्वे किंवा एस्टीचे आरक्षण केले असते आणि रजा मिळाली नसती तर पैसे वाया गेले असतेच पण सर्वांचा विरसही झाला असता. आणि आरक्षण न करावे तर रजा मिळाल्यास आयत्या वेळेला प्रवासाची सोय कशी होणार ही भिती. शेवटी ठरवले... जो होगा देखा जायेगा. एकीकडे आँफ़ीसचे काम जोरात सुरु केले की जेणेकरुन रजेची वेळ येइपर्यंत काम संपेल आणि एकीकडे प्रवासाची तयारीसुद्धा हळुहळु सुरु केली. तेवढ्यातल्या तेवढ्यात कुटुंबाने स्वतःची सरकारी नोकरी व माझी खासगी नोकरी यांची रितसर तुलना केली.

प्रवासाची तयारी करणे म्हणजे माहीती काढणे आले आणि माहीती काढणे म्हणजे गूगल वापरणे आले.
मी कोकणदौयाची तयारी करत असताना गूगल इन्क. मधले लोक "koakan" "kokan maps" "kokan travelling" "kokan hotels" इत्यादी शब्दांचे searches एकाएकी वाढल्यामुळे बुचकळ्यात पडले असतील असा माझा अंदाज आहे.

कोकणात जायचे चार मार्ग आहेत. एक म्हणजे MSRTC उपाख्य ST ची बस. हा सगळ्यात सोपा अणि सर्वांना परवडेल असा मार्ग. तुमच्या प्रवासाच्या तारखा निश्चित असल्यास आणि सुट्टीचा मौसम असल्यास महीनाभर आधी आरक्षण केलेले उत्तम. दुर्दैवाने ST चे आरक्षण अजुन internet वरुन होऊ शकत नाही.
http://msrtc.gov.in// ही आहे ST ची official site. ही site मराठीत आहे. येथे सर्व डेपोंमधून सुटणाया बसेसचे वेळापत्रक दिले असले तरी त्याची विश्वासार्हता मला तरी शंकास्पद वाटते.
वेळोवेळी वेळापत्रकात होणारे बदल site वर update होत असतील की नाही काही सांगता येत नाही.
शिवाय सुट्यांच्या दिवसात सोडल्या जाणाया जास्तीच्या गाड्यांची माहितीसुद्धा येथे मिळत असेल असे वाटत नाही. "Get timetable by SMS" अशीही एक सुविधा येथे आहे पण मी तिचा उपयोग केला नसल्यामुळे त्याविषयी काही भाष्य करणे उचीत होणार नाही.

मुंबईचा मुंबई सेंट्रलचा ST डेपो हे ST चे मुख्यालय. मुंबईतून मुंबई सेंट्रल, परळ, नेहरूनगर(कुर्ला), बोरीवली इ. ठिकाणांहुन बाहेरगावी जाणाया ST च्या बसेस सुटतात. ह्या बसेस आराम,निम-आराम व साध्या अश्या प्रकारच्या असतात. ST चे भाडेही खासगी बसच्या तुलनेत बरेच कमी असते. रत्नागिरी ते मुंबई ह्या साधारणपणे ३५० ते ३७५ किमी प्रवासाला आम्हाला रु ३६० फक्त प्रतिमाणशी पड्ले.

कोकणात जाण्याचा दुसरा तितकाच सोयीचा मार्ग म्हणजे कोकण रेल्वे. कोकण रेल्वेविषयी बरीच माहीती google वापरून मिळू शकते. हिचे आरक्षणही internet वरुन होऊ शकते. तुम्हाला कोकणात एकाच ठिकाणी बराच काळ मुककामाला जायचे असेल आणि तुमचे मुक्कामाचे ठिकाण रेल्वे स्टेशनपासुन जवळ असेल तर कोकण रेल्वे सोयीची पडेल.पण दापोली,गुहागरसारख्या स्टेशनपासुन लांब असलेल्या ठिकाणी जावय़ाचे असल्यास मात्र STच बरी.

पुर्वी जेव्हा ST नव्ह्ती तेव्हा लोक बोटीने कोकणात जात असत. मध्यंतरी पश्चिम किनायावर howercraft service सुरू करणार आहेत असे ऐकले होते. पुढे काय झाले काही समजले नाही. "तुकाराम" नावाच्या बोटीला जलसमाधी मिळाली होती असेही कुठेतरी वाचल्याचे आठवते.

कोकणातले रस्ते सुधारल्यापासुन (आणि कोकणातल्या लोकांची आर्थिक स्थिती सुधारल्यापासून) हल्ली बरेच लोक स्वतःच्या किंवा भाड्याच्या खासगी गाडीने कोकणात जाऊ लागले आहेत. साताठ माणसे असल्यास आणि कमीतकमी वेळात बयाच ठिकाणी जावयाचे असल्यास ते सोयीचेही पडते. चारपाच माणसांना चारपाच दिवस कोकणात sumo सारख्या वाहनाने जायचे असल्यास प्रवासखर्च,जेवणखाण,रहाणे व इतर खर्च मिळुन १२ ते १५ हजार रु अंदाजे खर्च येतो. स्वतःचेच वाहन असल्याने
मनसोक्त भटकता येते. आमच्या कुटुंबाच्या कानावर सहज माहीती म्हणुन हा पर्याय घातला असता, माझी वर्तणूक ही सकाळीच लाँटरी फुटलेल्या इसमासारखी कशी असते ह्याविषयी शेरेबाजी ऐकायला मिळाली. दहा हजार रुपयांत आणखी काय काय येऊ शकते याची भली मोठी यादीच बनवली गेली. गंमतीचा भाग म्हणजे या यादीतली एखादी गोष्ट आणावयाच्या वेळेस "इतक्या पैशात sumo घेऊन कोकणात फिरायला जाता येईल" हे ऐकायला मिळेल एवढे नक्की :) ....

पुढे चालू....... भेट देत रहा.